गिबन: एक ऐतिहासिक इतिहासकार

सुखा समाधानाने नांदणारी ग्रीक नगरराज्ये, त्यांच्यावर साम्राज्यवादी पर्शियन साम्राज्याचा हल्ला, ग्रीकांचा प्रतिकार, आलेक्जांडर ने केलेला “विश्वविजय”, ग्रीक संस्कृतीचा र्हास आणि ह्याच वेळेला पश्चिमेंकडे एका नवीन राज्याचा उदय होतो. हे राज्य पुढे राज्य राहत नाही, त्याचं साम्राज्यात रूपांतर होतं. पण ते साम्राज्यदेखील राहत नाही. ती बनते एक दंतकथा, एक मापदंड. पुढच्या अनेक पिढ्या जिच्या भव्यतेशी, तिच्या समृद्ध जीवनशैलीशी आपलं नातं जोडू पाहतात. इतिहासकार कुठल्याही साम्राज्याच्या आकाराचा अंदाज घेताना तिच्या आकाराच्या पटीत मोजतात, राजे रजवाडे तिच्या सम्राटांची आणि आपली तुलना करण्यात धन्यता मानतात. हे साम्राज्य फक्त एक भू-राजकीय गोष्ट न राहता एक अभिमान जागवणारी गोष्ट, एक वारसा बनते. रोमन साम्राज्य. पण कालांतराने सर्वांचं जे होतं तेच ह्या साम्राज्याचं देखील होतं. उत्पत्ति स्थिति आणि लय यांच्या चक्रातून ह्या महान साम्राज्याची देखील सुटका नाही. पण ह्या साम्राज्याचा उदय आणि ह्या साम्राज्याची स्थिरतेची वर्षं हा जसा एक रोमांचक काळ असतो तसाच ह्या साम्राज्याचा अपकर्ष हा देखील तितकाच उत्कंठापूर्ण असतो. आणि ह्या अवनतीच्या चक्राचा एक इतिहासकार शोध घेतो ते ही ह्या साम्राज्यात सम्राट आल्यापासून सतराशे वर्षांनी. त्याने लिहिलेला इतिहास हा त्या साम्राज्यासारखाचा एक मानदंड बनून जातो आणि इतिहासलेखनाच्या इतिहासात एक अमर स्थान मिळवतो. हा लेखक म्हणजे एडवर्ड गिबन.

मुळात गिबनला जन्मापासून इतिहासाचा वारसा एका वेगळ्या पद्धतीने मिळाला आहे. अमेरिकेत गृह युद्ध सुरू असताना दक्षिणेकडील लोकांनी इंग्लंडमधील शेअर बाजारातून पुढील मोसमात येणार्‍या कापसाची आगाऊ विक्री करून पैसे उचलले. पुढे दक्षिणेचा उत्तरेने पराभव केला आणि शेअर बाजार कोसळला. ह्या कोसळणार्‍या बाजारसोबत ज्या अनेकांचे पैसे कमवण्याचे इमले ढासळले त्यात गिबन चे आजोबा एक होते.  जाताना मात्र गिबन आणि त्याच्या वडिलांसाठी ठीकठाक इस्टेट सोडून गेले. पुढे आईचे दुर्लक्ष्य आणि मोलकरिणीचे जुलूम हयातून गिबन पिचला गेला. पुढे शिकला केंब्रिजमध्ये गेल्यावर गिबनचे वाचन भयानक वाढले. रोमन इतिहासावरचे त्याचे प्राथमिक वाचन त्याने ह्याच काळात केलं. पुढे गिबन रोमन कॅथलिक देखील झाला. काही काळ विद्यापीठात घालवल्यावर मन रमेना म्हणून गिबन ने शिक्षण सोडलं आणि स्वित्झरलँड मध्ये जाऊन राहिला. वडिलांनी इस्टेट मिळणार नाही अशी धमकी दिल्यावर साहेब परत प्रोटेस्टंट झाले. याच काळात त्याचं पहिलं प्रेम देखील जुळून आलं, आणि वडिलांचा हट्ट आणि प्रेयसीचा  हट्ट ह्यामध्ये ते कुस्करून गेलं. इंग्लंडला परत येऊन काही कल नोकरी केल्यावर गिबन युरोपच्या दौर्‍यावर निघाला आणि रोम मध्ये आल्यावर त्याला आपल्या आयुष्याचं ध्येय गवसलं. रोम मध्ये आल्यावर गिबन भारावून गेला. त्याच्या शब्दात सांगायचं तर “रोम्युलसने केलेली रोम ची पायाभरणी, आणि जूलियस सीझरचा खून असे अनेक प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. रोमच्या राजप्रासादाजवळ जूपिटर च्या मंदिरात बसला असताना रोमन साम्राज्याच्या र्हासचा इतिहास लिहावा अशी तीव्र भावना त्याच्या मनात जागी झाली. दोन अडीच वर्षे दौरा केल्यावर साहेब परत इंग्लंडला आले. पुढे पाच एक वर्षात वडील गेले. इस्टेटीची विल्हेवाट लाऊन आणि आर्थिक प्रश्नांपासून आपली सुटका करवून घेत गिबन अखेर 1773 मध्ये लिहायला बसला. पंधरा वर्षे आपल्या ह्या समाधीत घालवल्यावर गिबनने आपल्या ह्या पुस्तकाचा पहिला भाग प्रकाशित केला. लवकरच इतर पाच भागदेखील प्रकाशित झाले आणि गिबन ने लोकप्रियतेचा कळस गाठला. डेव्हिड ह्यूम सारख्या ख्यातनाम विचारवंतानेदेखील गिबन च्या लेखनाचा गौरव केला. पुढील काही वर्षे मान सन्मान स्वीकारण्यात गेली. वयाच्या ६५ व्या वर्षी हा महान लेखक मरण पावला.. आपल्या मागे इंग्रजी भाषा आणि इतिहासाच्या क्षेत्रामधले एक अनमोल रत्न सोडून…

ओघवती, प्रवाही भाषा, जड जड शब्दांचा शक्य तितका कमी भडिमार करून आपले विचार एका सुंदर चौकटीमधून मांडणे ही गिबनची खासियत. इंग्रजी भाषेचा आपला एक बाज, आपलं असं एक भव्यत्व आहे, जसं ते सार्‍या भाषांचं आपापलं वेगवेगळ असतं. त्या भव्यत्वाला समोर ठेवून गिबन लिहितो. प्रत्येक प्रकरणामागे साधारण शंभर सव्वाशे संदर्भांचा अक्षरशः भडिमार असतो जो लेखकाने ह्या सार्‍या लेखनप्रपंचासाठी उपसलेले कष्ट दाखवायला पुरेसा आहे. आपल्या आधी ज्या लेखानांनी त्या विषयावर थोडे जरी काही लिहिले आहे त्यांचा परामर्ष घेतल्याखेरीज तो राहत नाही. आणि केवळ परामर्श घेऊन नव्हे तर त्यामागील सत्य-असत्य आणि लेखक ह्या साऱ्या घटना वर्णन करत असताना त्याचा त्या मागचा भाव काय आहे हे जाणून घेऊन मगच तो पुढे जातो.

“वॉर एंड पीस” मध्ये लिओ टोलस्तोय म्हणतो, “आपण इतिहासाचा अभ्यास करताना तो काळ कुठल्या राजाच्या राजवटीखाली होता ह्याचा किंवा त्याचे प्रधान कोण होते ह्याचा विचार करतो. वास्तविक हे गणितामधल्या विभाजन किंवा differentiation ह्यासारखे आहे. पण इतिहास असा घडत नसतो, तो घडतो ते त्या काळात अस्तित्वात असणारा समाजातला सर्वात लहान घटक अर्थात सामान्य माणूस काय विचार करतो ह्यावरून ठरतं. त्या सामान्य माणसांचे भाव समजून घेऊन त्यांचा एकीकरण अथवा integration करणं ह्यातून आपण त्या काळाचा खरं अंदाज बांधू शकतो.” गिबन अगदी सामान्य माणसाच्या भावनांना हात घालत नसला तरी तर्काचा आधार घेऊन त्या कालच्या समाज जीवनामध्ये एक बुडी मारून जरूर येतो. रोमच्या साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणमिमांसा करताना केवळ रोमच्या शत्रूंची सामरिक ताकदीचा अंदाज न घेता तो त्यांचे सामाजिक जीवन खूप जवळून पाहतो. पारशी लोक ज्यांनी अलेक्झांडर सेव्हेरसच्या काळात रोमवर अर्दाशीर च्या नेतृत्वाखाली चढाई केली होती, त्यांच्या धर्माचे, त्यांच्या समाजाचे, त्यांच्या राजकीय नेतृत्वाचे पडसाद गिबनच्या लेखनात उतरल्याखेरीज राहत नाहीत. जी कथा पारशी लोकांची तीच जर्मनी मधल्या बार्बेरीयन लोकांची. गिबन त्यांच्या समाजाचे एक सुंदर चित्र रेखाटतो. मदिरालयात होणाऱ्या मारामाऱ्या, जर्मन लोकांचं आपल्या स्वातंत्र्याविषयी असणारं आकर्षण ह्या गोष्टी आपण समोरासमोर अनुभवू शकतो.

संदर्भ केवळ मांडून न ठेवता विवेकी बुद्धीने त्यांची छाननी करणे आणि त्यामधील अधिक चांगला, वस्तुनिष्ठ, आणि तपशीलात योग्य असा संदर्भ समोर ठेवणं ही गिबनची कला. अनेकदा जुन्या ग्रंथांचे भाषांतर करताना झालेल्या चुका गिबन निदर्शनास आणून देतो. वेगवेगळया ठिकाणी त्याने वापरलेल्या उपमांचे अगर विशेष शब्दांचे संदर्भ सापडतात.

इतिहास घडवणे ह्याइतकीच तो निरपेक्षपणे लिहिणे ही एक कला आहे. लोकांनी इतिहास लिहिताना सन सनावळ्या ह्यांचा अतिरेकी वापर केला आणि गणिताहूनही जास्त आकडे इतिहासात येऊ लागले आणि मग लोकांनी इतिहासाच्या नावाने आकड्या काढायला सुरुवात केली. जर “ह्या ह्या काळी असं झालं” हेच लिहायचं असेल तर त्याला नोंद म्हणतात आणि तो काळ कुठलाही रण भीमदेवी थाट न आणता लोकांच्या समोर जिवंत करणं ह्याला इतिहास म्हणतात. गिबन अगदी हेच करतो. मार्कस ओरीलीअस चा  वर्णन करताना त्या तत्वज्ञ सम्राटाची जीवनगाथा तो अगदी उत्कटपणे सांगतो. पण पुढे ओरीलीअस चा उल्लेख एका ठिकाणी करताना “ह्या सम्राटाला पुत्रामोह आवरला असता तर किती बर झालं असतं” अशी सरळ आणि रास्त टीकाही गिबन करून जातो. डायोक्लेशियन च्या संयमी प्रवृत्तीचं गुणगान करताना त्याच्या ४ सम्राट करण्याच्या कल्पनेत रोमन साम्राज्याच्या विभाजनाची बीजे आहेत हे ही सांगायला तो विसरत नाही. ह्याच डायोक्लेशियनच्या काळात रोमन शिल्पकला किती सामान्य दर्जाची होती ह्याची आठवण करून द्यायलाही तो विसरत नाही. निरोच्या जुलुमी राजवटीचा धिक्कार करताना ओरीलीअस पुत्र कोमोडस ने उभा केलेला हिंसेचा डोलारा पाहून त्या संगीतप्रेमी सम्राटाची क्षणिक भलावण करून त्याला कोमोडसहून चांगले स्थान देण्याचा सुज्ञपणा तो दाखवतो. इतिहासात कुणीच वाईट नसतो, सगळे त्या त्या क्षणाचे गुलाम असतात त्यानुसार गिबन त्या माणसाच्या कृतीतून त्याचं स्वभाव रेखाटतोच पण त्याच्या लहानपणीची परिस्थिती सांगून साधारण त्याच्या मूळ स्वभावाची कल्पनादेखील तो देऊन जातो.औट घटकेचा सम्राट पर्टीनाक्स ह्याचा त्याच्याच सैनिकांनी केलेला निर्घृण खून आणि जुलुमी काराकेला ह्याचा त्याच्या एका रक्षकाने केलेला खून ह्या सारख्याच दिसणाऱ्या घटनांना त्याचा मिळणारा प्रतिसाद वेगळा आहे.

इतिहास त्यावर ज्याचे प्रेम आहे आणि ते सुद्धा साक्षेपी प्रेम आहे अश्या लोकांनीच लिहायचा असतो. गिबनचे इतिहासावरचे हे प्रेम पाना-पानांतून झळकते. वर उल्लेख केलेल्या डायोक्लेशियन च्या प्रासादाचे सध्याचे हाल सांगताना गिबनची लेखणी सुन्न करून टाकते. रोमन साम्राज्य हा गिबन च्या प्रेमाचा विषय. पण असं असताना देखील रोमन साम्राज्याचा उदय हा जसा एका चक्राच्या फिरण्याचा परिपाक होता तसाच त्याचं अस्त हा देखील अनिवार्य होता हे वास्तव त्याला मान्य आहे. रोमच्या ऱ्हासाने झालेली हानी त्याला पुरेपूर ठाऊक आहे. पण असे असून देखील “रोम राहायला हवं होतं हो.. किती मस्त होतं ते..” असली भाषा तो कधीच काढत नाही. किंबहुना स्वातंत्र्य आणि दडपले जाण्याला विरोध ह्या ज्या मूल्यांनी रोमन साम्राज्याची पायाभरणी केली त्या मुल्यांचा ऱ्हास झाल्याने रोम बुडाले असेच प्रतिपादन तो करतो. पुस्तक वाचून खाली ठेवल्यावर डोळ्यासमोर एक चित्र घेऊन आपण उठतो, आणि एक वेगळी धुंदी अनुभवतो. हेच गिबनचे कौशल्य आहे.

Posted in इतिहास | 2 प्रतिक्रिया

जलचक्र

रात्रीची वेळ होती. नेहेमीची नीरव शांतता आसमंत भरून टाकत होती. मधूनच येणारा वारा पहाऱ्यावर बसलेल्या चौकीदारासारखा शीळ घालून जात होता. त्याच्या येण्याची चाहूल लागताच बिचारी पाने झोपमोड होऊन कुस बदलत होती,तर काही गारठ्याच्या जाणिवेने थरथरत होती. त्याची ती संथ आणि धीरगंभीर शीळ पानापानांतून घुमत होती. वडाची पाने आपल्या पित्याचं अनुकरण करत स्तब्ध उभी होती. पिंपळ मात्र नेहेमीसारखे इतरांच्या झोपेचे खोबरे करून टाकायचे ह्या इराद्याने पेटून उठला होता. येणाऱ्या प्रत्येक झुळूकीसरशी त्याची पाने नव्या उत्साहाने वाजत होती गाणी गात होती. जगाच्या घडामोडींपासून अलिप्त असलेली ती त्यांच्याच आनंदात मग्न होती. औदुंबर अजूनही त्याच निर्मल झर्याच्या पाण्यात आपली मुळे बुडवून बसला होता. ते पाणी शाळेतल्या एखाद्या वर्गात होते तशी कुजबुज करीत चालले होते. आणि त्यांच्याकडे एखाद्या प्रौढाच्या स्थितप्रज्ञतेने पाहत तो औदुंबर आपल्याशीच हसत असावा. त्याची पाने किंचित डुलत होती, पण आवाज मात्र अजिबात नव्हता. दूर कुठेतरी अशोकाचा वृक्ष कुणा सुंदर स्त्रीच्या प्रतीक्षेत तिष्ठत उभा होता. असे म्हणतात कि जर कुणा सुंदर तरुणीचा पाय लागला तर अशोक फुलतो. त्या स्पर्शाची वाट पाहत तो उभा होता कदाचित.

ह्या सार्या त्या त्या दिशांची क्षितिजे व्यापून टाकणाऱ्या महावृक्षांच्या पायांशी हिरव्यागार गवताची एक विस्तीर्ण चादर अंथरलेली होती. येणारी प्रत्येक झुळूक त्या गवताच्या पात्यांना स्पर्श केल्याखेरीज पुढे जात नव्हती. पण असे असून देखील हि सारी पाती तशीच होती. स्तब्ध, अविचल. कुठूनतरी अवचित येणारा वारा अजून देखील त्या माळरानावरच घुटमळत होता. गवताच्या पात्यांशी, झाडाच्या पानांशी झिम्मा खेळत हा वारा पुढे जात होता. औदुंबराच्या पायाशी खळाळणाऱ्या त्या ओढ्याच्या पाण्याच्या अवखळ थेंबांशी अलगद लगट करत होता. रानोमाळ फिरताना आलेले आपले अनुभव त्यांना सांगत असावा बहुधा… त्याच्या त्या निवेदनानं त्या हिरव्यागार शांत जगाची भुरळ पडलेली ती जणू नाचत बागडत होती. त्यातल्याच काही अवखळ थेंबांनी ठरवलं जायचं त्या दूर देशाच्या प्रवासाला… वाऱ्याचा वारू करून… आणि मग काय, झरकन निघाली ती त्या चंचल अवखळ वाऱ्यासोबत ! त्या अद्भूत दुनियेच्या सफरीवर. खळाळत वाहणाऱ्या आपल्या मित्रांचा निरोप घेऊन. त्या चांदण्या रात्रीत, निरभ्र आकाशात. वाटेत त्यांना भेटला शांत वड, नादमधुर पिंपळ, स्थितप्रज्ञ औदुंबर आणि स्तब्ध अशोक. वाहत्या वाऱ्याच्या संगतीने ती बापुडी खूप फिरली, दमली आणि पेंगू लागली. वाऱ्यानं त्यांची ती अवस्था जाणली आणि अलगद आणून सोडलं त्यांना हिरव्यागार गवताच्या कुशीत. त्या गवताच्या पात्यांवर ती निवांत झोपली. थोडा वेळ गेला आणि सूर्याचे घोडे जुंपून अरुणाने आकाशात पाउल टाकलं. “आजची रात्र काही वेगळी असावी बहुधा… कारण आज हे गवत चमकून उठलंय” अरुण स्वतःशीच म्हणाला. आदल्या रात्री वाऱ्याने गवताच्या पात्यावर सोडलेले ते जलबिंदू एव्हाना एकत्र आले होते आणि त्या दवबिंदूंनी व्यापलेलं ते गवत तो पहिल्या प्रथम पाहत होता. आश्चर्यचकित झालेला तो तसाच पुढे गेला आणि थोड्या वेळाने साक्षात सुर्यनारायण आले. त्यांना पाहून वाऱ्यानं त्या थेंबांना अलगद उठवलं. आळोखे पिळोखे देत ती उठली. सुर्याचं ते तेजःपुंज रुपडं पाहून हरखली. वाऱ्याला म्हणाली, “आम्हाला अजून पहायचंय हे जग, घेऊन चल आम्हाला समुद्रापार, आणि आणून सोड पुन्हा त्या औदुंबराच्या मुळाशी, आमच्या सख्या सुहृदांपाशी.” वारा हसला. कबुल झाला.. आणि ते थेंब उडाले पुन्हा त्याच्या सोबत.. नव्या सफरीला.

सूर्य नारायण अस्ताला गेले, आणि पुन्हा एकदा काळोखी रात्र सुरु झाली. एव्हाना फिरायला गेलेले आपले मित्र अजून आले कसे नाहीत ह्याची चिकित्सा करत इतर जलबिंदू बसले होते. पुन्हा वारा आला, त्याला त्यांनी विचारलं. वारा म्हणाला, “येऊन बघा की तुम्हीच.” काही धीट त्याच्या सोबत गेले. खूप दिवस गेले, असेच रोज अनेक जलबिंदू जात होते आणि एके दिवशी पहिल्या दिवशी गेलेले जलबिंदू परत त्या माळरानावर जमले. एव्हाना प्रवासाच्या दगदगीमुळे त्यांचा मूळ रंग गेला होता. काळे कुळकुळीत होऊन ते परतले होते. वाऱ्याने त्यांना हलकेच धक्का दिला आणि आपल्या मित्रांना भेटायला आतुर झालेले ते धो धो बरसू लागले. आपल्या त्या जलधारेत मिसळू लागले. त्यांचं ते मिलन पाहूनवारा सुद्धा बेभान होऊन नाचू लागला. वड अजूनही तसाच शांत होता, पिंपळ तसाच नादमधुर, अशोक स्तब्ध आणि औदुंबर स्थितप्रज्ञ…

Posted in सहज सुचलेले | यावर आपले मत नोंदवा

batmanअष्टक

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

निखिल बेल्लारीकर ह्यांच्या वरील पोस्ट वरून आमचे लाडके हिरो batman ह्यांचेवर एक काव्य लिहावे अशी आस होती. आज ती भागवून घेत आहोत… लोकांना आवडले तर आणखी लिहू म्हणतो… कसे वाटते ते कळवा..

वंदूनिया श्रीगणेशा | कथा सांगणे अमुचा पेशा ||

तेणे कृपे जन रोषा | झेलीतसे ||

ऐका श्रोते सकळ जन | भय मुक्तीचेनी साधन ||

दुष्टांचेही होई दमन | अती-त्वरित ||

कथा एका मानवाची | जेणे ठासली दुर्जनांची ||

करोनी सोडिले तयांसी | पळता भुई ||

गोथम नावे एक नगर || गुन्ह्यांचे जणू आगर ||

सकळ रहिवासी असती | भयांकित ||

तेथला एक राजपुत्र | सरळ जीवन ज्याचे सूत्र ||

म्हणती त्यास मित्र | ब्रूस वेन ||

ब्रूस असे अवखळ भारी | मस्तीची त्यास आवड बरी ||

अंगणातल्या सकळ विहिरी | फोडीतसे ||

एके दिशी होय कहर | गुंड दावी बंदुकीचा डर ||

करी त्याच्या पालकांचा खून | निर्घृण ||

ब्रूस होई वेडा पिसा | म्हणे गुंड सुटतो कसा ||

क्रोधे होई कोरडा घसा | अशी स्थिती ||

त्याची एक मैत्रीण भारी | रेचेल नावाची नारी ||

लाईन मारती तीवर सारी | वेडी मुले ||

ब्रूस होई भूमिगत | होई कार्यासी रत ||

शोधे तो सतत | गुंड-मानस ||

तया भेटे एक गुरु | ट्रेनिंग त्याची होई सुरु ||

जिंकू किंवा मरू | बोध ज्याचा ||

ब्रूस येई घरी परत | होती सगळे विस्मित |

तरी सगळे सस्मित | करिती स्वागत ||

पाहुनी नगरीची दुर्दशा | ब्रूस होई वेडा पिसा |

सुधारणेचा वसा | घेई तो ||

आल्फ्रेड त्याचा नोकर | फॉक्स नावे सहचर |

होती त्याचे साथीदार | ह्या कामी ||

वेश तो शिवे भारी | गाडी घेई नवी कोरी |

नाव जिचे करारी | बेट मोबिल ||

म्हणे राहीन ना मी मनु | आदर्शाचा इंद्रधनू |

न्यायाचा आद्य चिन्हू | होईन मी ||

दिवसा ललनांच्या संगे | भोग विलासात रंगे |

रात्र येता त्याची ढंगे | बदलती ||

येणे म्हणोन राही उभा | जावोनी भिडे नभा |

थक्क होऊनी म्हणे सभा | batman ||

पाहुनी त्याची कारागिरी | अविरत मारामारी |

गुन्हेगारांसी तिरीमिरी | निश्चित ||

गुन्हेगारीची जाई रया | निश्चिंत फिरती मुले आया |

विदूषक पाहुनी हेया | चिडचिडे ||

उचलोनी अपुले हत्यार | बोलावून अपुले यार |

विदूषक करी एल्गार | एकमुखे ||

वापरोनी भय रस | करी लोकांचा निरस |

व्हाय सो सिरीयस | पुसतसे ||

परी हिरो अमुचा भारी | बैसे त्याच्या उरावरी |

विदूषक जाई कारीं | विनासायास ||

येणे करोन करितो पुरे | सांगायासी खूप उरे |

परी असे पुर्णाहुनी अधुरे | उत्तम ||

म्हणौनी माझे जुने उणे | हॉकी pad ही कवच होआवे |

फॉक्स कृपा काई न्हवे| गुन्हेगार “राम” म्हणे||

अथ श्री नोलानार्पणमस्तु | बॉब केन की जय ||

Posted in कविता... | 4 प्रतिक्रिया

एक अनुभव

अनेकदा असेच बसलेलो असतो, तुम्ही, मी आपण सगळेच. कुणीही ह्या अनुभवातून सुटलेला नाही. मन विचार करण्याच्या पलीकडे गेलेलं असतं. एक वेगळीच पोकळी असते. बोलायचा खूप काही असतं, पण बोलवत नाही. ह्या अबोल्याच कारण उमगत नाही. एरवी वाट फुटेल तिथे चौखूर धावणारं उधळणारे मन जणू एखादी जादूची कांडी फिरावी किंवा अर्धांगवायू व्हावा तसं जागच्या जागी स्थिर उभं आहे असं वाटतं. पण हे ही वाटणंच !! आपलं अवखळ मन त्या क्षणी सुद्धा विचार करत असतं, स्वतःलाच विचारात असतं, आपण कसलाच विचार का करत नाही? काय झालंय आपल्याला? दूर कुठेतरी चमचमणारे तारे अश्या वेळी आणखीनच दूर वाटू लागतात. पानांची ती सळसळ अजूनच जास्त जोराची वाटू लागते. एरवी आपण ज्या कुठल्या विषयावर शांतपणे विचार करू असं ठरवलेलं असतं असे विचार नकोसे होतात. मित्रांमध्ये हे पुस्तक मला आवडलं म्हणून जे पुस्तक आपण मिरवत असतो ते हातात घेववत नाही. मन काहीच विचार करत नसतं किंवा तसं दाखवत तरी असतं. आणि मग अश्या वेळी रात्र असेल तर मग विचारायलाच नको. सभोवार पसरलेला काळोख, दूर पर्यंत पसरलेला एकांत, आणि ज्याच्या आत काय दडलंय हे माहित नसतं असं एक गूढ वातावरण. आत मनाचा हा थयथयाट चालू असतो. एरवी वाऱ्याच्या वेगाने धावणारं हे मन ढिम्म हलत नसतं. बरं ह्या अबोल्याच कारण काही काळात नसतं. आत एक रहस्य, बाहेर दुसरं. आणि सांगायला कुणी नाही. असलोच तर आपले आपण. खरं सांगायचा तर रात्रीच्या गर्भात दडलेल्या त्या निरव शांततेचा आपल्याला त्रास होत असतो. एरवी जगाला निरखणारे आपण त्याच जगाचा विचार करत असतो. ते जग दूर झालं की आपलं मन सैरभैर होतं. कदाचित आपल्या मनाला सभोवतालचं जग आणि त्यावर आधारित त्याचं आणि त्याच्या विचारांचं अस्तित्व ह्याची इतकी सवय झाली असते की त्याला आज आपले आपण आहोत, धाक दाखवायला कुणी नाही ही भावनाच सहन होत नसावी. स्वतःला सामोरं जाताना म्हणून तर गोची होते. आपण आपला म्हणजे स्वतःविषयीचा असा विचार कधी केलेला नसतो. मग कैक दिवसांनी भेटणाऱ्या एखाद्या दूरच्या नातेवाइकाशी भेटल्यावर जशी अवस्था असते तशी काहीसे आपण वागतो. बोलायला काही नसतं. आणि नव्याच माणसाला भेटल्यावर येते तशी विचित्र भावना येते. त्या क्षणाला मन गोठलेल्या सागरासारखं असतं. वरून शांत पण आतून खळबळ.. त्या वरवरच्या गोठलेपणाच्या माध्यमातून आपण व्याधाच्या बाणाचा पायाच्या बोटावर आघात होण्यापूर्वी कृष्ण ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेच्या जवळ जातो. फरक फक्त एव्हढाच की कृष्णासाठी हे स्वतःला सामोरं जाणे हा आनंदाचा क्षण असतो. आपण मात्र आपल्या अस्तित्वासाठी जगावर विसंबलेले. आपल्याला ह्याचं त्रास होतो. हे मन शांत करण्यासाठीच बहुधा ज्ञानोबा देवाचिये द्वारी उभं क्षणभरी म्हणून गेले असावेत.आणि कदाचित ह्या रात्रीच्या एकांतापासून दूर राहण्यासाठी आपण लवकर झोपतो…

Posted in सहज सुचलेले | यावर आपले मत नोंदवा

एक अधुरे पान

अर्धवट लिहिलेली एक ओळ … खूप पूर्वी लिहिलेली… आता ती पाने परतून वाचताना बरेचसे संदर्भ पुसट झालेले असतात. अनेकदा “आपण असं का लिहिलं?” हेच आठवत नाही, तर कधीकधी “काय लिहिलंय” याचं आकलन होत नाही. मग या साऱ्या विस्मरणाने गांजलेले आपण सुद्धा बदलतो. नवी विटी नवे राज्य ह्या न्यायाने पुन्हा तीच गोष्ट नव्याने लिहायला बसतो. पण आता राज्य तेच राहिलेलं नसतं. फार कशाला? ती कथा रचणारे आपण देखील बदललेलो असतो. पुन्हा एकवार नव्याने धडपड सुरु होते. नव्या कथेची मांडणी सुरु होते. जुन्या कथेचा प्लॉट जुना आणि म्हणूनच वापरलेला वाटू लागतो. त्यातलं नवेपण निघून गेलेला असतं. म्हणून नव्या कथेचा शोध सुरु होतो. नव्या कथेत नवी पात्रं असतात. त्यांच्या वर्णनाला अगदी चपखल बसणारी खऱ्या जगातली खरी (?) माणसं शोधायचा प्रयत्न सुरु होतो. बऱ्याचदा जशी हवी तशी माणसं मिळत नाहीत. कारण अनेक… एकतर आपण जसे आहोत तसे जगाला दाखवायची आपली तयारी नसते किंवा समोरची व्यक्ती जशी आहे तशी तिला स्वीकारायची आपली तयारी नसते. याचं परिणाम आपल्या कथेवर होतो. हळूहळू वास्तवातल्या व्यक्तींना कथेतल्या पात्रांमध्ये बसवायची धडपड किती व्यर्थ आहे हे आपल्याला उमगू लागतं. पात्रांमध्ये बसतील अशी नवीन माणसे शोधायला आपल्याला वेळ नसतो. अखेर पर्याय न मिळाल्यामुळे कथा बदलायचा प्रयत्न सुरु होतो. पण एव्हाना वेळ टाळून गेलेली असते. आपली कथा, ती वाचायची, ऐकायची आणि लिहायची इच्छा मारून गेलेली असते. अखेर पेनाचं टोपण लावला जातं. पुन्हा उरते एक अर्धवट ओळ, खूप पूर्वी लिहिलेली … पुसत झालेल्या संदर्भासकट… विस्मरणात गेलेल्या कारणासकट…

दिनांक ६ डिसें. २०११

नाशिक

Posted in Uncategorized | 4 प्रतिक्रिया

भाषावार प्रांतरचना एक विचार

इंग्रज भारतातून गेले आणि नवा भारत कसा असावा ह्याच्या विचायी तर्क-वितर्कांना उधाण आलं. जितके लोक तितकी मते, जितकी मते तितकी अनुमोदने आणि तितके विरोधी सूर असं काहीसं चित्र भारतात होतं. आणि ह्यातच भारताच्या नूतन सत्तेकडून काही चुका झाल्या. फाळणीची हाताळणी ही त्यातली एक चूक. पण त्याहूनही दूरगामी अशी एक चूक म्हणजे भाषावार प्रांतरचना. खरं सांगायचा झालं तर भाषावार प्रांतरचना ह्या विषयावर माझं फारसा अभ्यास नाही. ज्या अनेक महान लोकांनी ह्या विषयावर अभ्यास केला आहे त्यांच्या कुठल्याही विधानांचा वापर मी केलेला नाही. हे ऐकून ज्यांना माजे विचार पटणार नाहीत त्या वाचकांचा एक सहज आणि उत्स्फूर्त प्रश्न -आणि जो माझ्या मते फारसा चुकीचा ही नाही- असेल “जर अधिकार नाही तर हा सारा खटाटोप कशाला?” त्यांना मला इतकेच सांगायचे आहे की हा लेख म्हणजे कुणा विद्वान माणसाचे विचार नव्हेत. मी, आणि माझे दोन मित्र ज्ञानेश्वर पाटील आणि अनिरुद्ध कट्टी ह्या दोघांशी रात्री ११ पासून पहाटे ४ वाजेपर्यंत झालेल्या चर्चेतून जे काही गवसले त्याचा हा गोषवारा आहे. ह्यातले काही मुद्दे गळाले असतील अशी शक्यता आहे. मूळ शब्दांची जागा काही ठिकाणी नवीन शब्दांनी घेतली आहे असंही झालं असेल. पण चर्चेतील मुद्द्यांना कमीत कमी धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे.हा लेख जितका माझे विचार मांडण्यासाठी तितकाच किंबहुना जास्त ह्या विषयाच्या इतर पैलूंना समोर आणण्यासाठी आहे. म्हून ह्यात ज्या चुका असतील त्या दाखवाव्यात अशी चिकित्सक वाचकांना विनंती आहे. आणि नवीन मुद्दे -मग ते समर्थनार्थ असो अगर विरोधात्मक- मांडावेत.

भाषावार प्रांतरचना ह्या विषयाला स्पर्श करण्या आधी ही प्रांतरचना ज्या भारत ह्या देशाला लावली गेली त्या देशाविषयी. मुदलात “भारत” अशी एकजिनसी गोष्ट कुठली राजकीय रचना म्हणून इतिहासात कधी अस्तित्वात नव्हती. भारताला एकत्र ठेवणारा धागा म्हणजे इथली संस्कृती. भारत पूर्वीपासून सांस्कृतिक दृष्ट्या एक आहे. पण भारताला नेहेमीच भौगोलिक दृष्ट्या वेगवेगळया शासन पद्धतीची गरज भासली आहे. कारण आहे भारताचा भौगोलिक विस्तार आणि त्या अनुषंगाने आलेले हवामान विषयक आणि जीवन पद्धती मधील वैविध्य. म्हणून ग्रीक नगर राज्यांप्रमाणे इथे स्थानिक शासनाची नेहेमीच गरज भासली आहे. आणि जेंव्हा जेंव्हा भारताला एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न झालं तेंव्हा तेंव्हा काही विशिष्ट काळाने भारतात वेगवेगळी राज्ये प्रबळ होऊन वर आली आणि त्यांनी केंद्रीय सत्तेचे वर्चस्व नाकारले आहे. अशी उदाहरणे ज्ञात इतिहासात अगदी महाजनपदांच्या काळापासून सापडतात. सिंधुपासून कावेरीपर्यंतचा भारत पहिल्याप्रथम अशोकाने आपल्या वर्चस्वाखाली आणला. पण त्याच्या मृत्युनंतर काही वर्षातच कलिंगामध्ये खारवेल राजा, आणि त्या पाठोपाठ दक्षिणेत आंध्रभृत्य ह्यांचे उठाव होऊन ते स्वतंत्र झाले. हीच गोष्ट थोड्याफार फरकाने नंद, गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट यांच्या काळात झाली. जेंव्हा जेंव्हा एका केंद्रीय सत्तेने पूर्ण भारत आपल्या थेट वर्चस्वाखाली ठेवण्याचा प्रयत्न केलं तेंव्हा ते तोंडघशी पडले आहेत. मोगलांचे सामार्थ्य्साली साम्राज्य दक्षिण ताब्यात येताच उत्तरेतली पकड गमावून बसले आणि नंतर दिल्लीच्या अंगण ओसरीमध्ये हुकुम सोडण्यापुरते उरले. म्हणून भारत ह्या भूभागाला एक राजकीय गोष्ट म्हणून इतिहासात पूर्वी स्थान नव्हते. इंग्रजांनी भारतात पाय रोवले तेंव्हापासून त्यांनी पूर्ण भारत थेट आपल्या ताब्यात आणला नाही. जिथे जमेल तिथे आपल्याला अनुकूल असे शासक सत्तेवर ठेवून त्यांनी इतरांची उचलबांगडी केली. पेशवे, छत्रपती, मोगल, झाशी इथली संस्थाने खालसा झाली पण निजाम, शिंदे, गायकवाड ह्यांची संस्थाने तशीच राहिली. थोडक्यात ब्रिटिशांनी देखील पूर्ण भारतावर ‘थेट’ राज्य कधी केले नाही. संस्थानांच्या बाबतीत जरी मागून सूत्रे हलवणारे ते असले तरी जनतेसमोर राजा हाच त्यांनी तेथील शासनव्यवस्थेचा प्रमुख ठेवला. ह्याचा पुरावा म्हणून हा तत्कालीन भारताचा नकाशा. http://mapsof.net/uploads/static-maps/historic_maps_british_india.png

परंतु, ब्रिटीश भारतातून गेले आणि भारताला ‘एक’ राजकीय शक्ती म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. निझाम, गोव्यातले पोर्तुगीज ह्यांचे उच्चाटन झाले आणि सगळा भारत एका राजकीय झेंड्याखाली आला. इथून खरी गम्मत सुरु झाली. ब्रिटीश जाताना भारतात एक रुजलेली आणि लोकांना मानवलेली अशी महसूल व्यवस्था सोडून गेले होते. ह्या महसूल व्यवस्थेच्या योग्य आणि लोकोपयोगी उपयोजनासाठी तिचे प्रांतवार विभाग पाडून तिला अधिकारक्षेत्र देण्यात आले होते. भारत स्वतंत्र झाल्यावर ह्या महसूल आणि इतर प्रशासकीय व्यवस्थेचा आहे तसा अंगीकार केला गेला. आणि ही व्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत करण्यासाठी (किंवा अश्या दर्शनी हेतूने तरी) देशाचे प्रांत पुन्हा आखले गेले आणि भाषा हे आधारभूत तत्व मानून त्यांची रचना केली गेली. पण हीच पद्धत भारताच्या सध्याच्या प्रगतीच्या मुळावर आली आहे. ह्याला कारणे दोन.

पहिले कारण: भारताचा इतिहास हा मुदलात एक भारत विरुद्ध परकीय असा नाहीफार क्वचित होता. मुख्यत्वे भारताचा इतिहास एका प्रदेशाचा हिरो किंवा नायक विरुद्ध दुसऱ्या प्रदेशाचा नायक (अर्थात पहिल्या प्रदेशासाठी खलनायक) असा आहे. उदाहरण द्यायचे झाले तर लछित बडफुकन (आसामचा प्रसिद्ध सेनानायक) आणि औरंगजेब ह्यांचा संग्राम. किंवा महाराणा प्रताप आणि मुघल बादशहा अकबर. अशी अनेक उदाहरणे आहेत. म्हणून जेंव्हा एक समुदाय किंवा एक भाषिक गट जेंव्हा आपल्या नेत्याची भलावण करू पाहतो तेंव्हा दुसऱ्या गटाच्या नेत्याचा उपमर्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाषिक ऐवजी प्रादेशिक म्हणूया. जर अश्या समान अभिमान असणाऱ्या भाषिक गटांना एकत्र आणले तर त्यांची आपल्या इतिहासाविषयी असणारी आत्मीयता वाढेल परंतु त्याच बरोबर इतर कुणी त्या इतिहासाचे केलेले वेगळे विवेचन खपवून घ्यायची त्यांची क्षमता अर्थात परमतसहिष्णुता संपेल. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आणि औरंगजेब. म्हणून अश्या भाषिक गटांना त्यांच्या भाषेच्या आधारावर एकत्र आणणे हा पर्याय होऊ शकत नाही असे माझे स्पष्ट मत आहे. कारण अश्या भाषिक गटांच्या अभिमानाचा विषय असणाऱ्या गोष्टींचा वापर करून कुठलीही प्रादेशिक शक्ती त्या प्रदेशमध्ये आपले बहुमत बनवू शकते. अश्या प्रादेशिक शक्तींचा उदय केंद्रीय शक्तीला नेहमी घातक ठरतो. उदाहरण द्यायचे झाले तर बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांचा उदय झाल्यामुळे कोंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचे उत्तर प्रदेशातील बळ बरेच कमी झाले ज्याचा परिणाम त्यांना केंद्रात स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात आलेल्या अपयशात झाला. प्रादेशिक पक्ष प्रबळ झाले की ते राष्ट्रीय पक्षांना वाकवू शकतात आणि येणेकरून देशाचे धोरण ठरवताना आणि त्याची अंमलबजावणी करताना सरकारची गोची होते.. आणि  ह्याची आणखी एक किनार म्हणजे जर असे भाषिक गट तयार केले गेले तर इतर प्रदेशात राहणाऱ्या आपल्या समभाषिक गटांविषयी त्यांना वाटणारी आत्मीयता वाढते आणि ह्यातून वाद होतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद असो किंवा गुजरात आणि महाराष्ट्र ह्यांच्यात मुंबईवरून झालेला संघर्ष असो हे याच प्रकारचे वाद आहेत. आणखी सांगायचे म्हणजे भारतात एकाच भाषेची अनेक रूपे आहेत आणि काही भागात भाषा जरी वरकरणी सारखी वाटली तरी अंतरंगी त्यात आणि म्हणून भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये भेद आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर आंध्र प्रदेशमध्ये  सध्या चालू असणारा वाद. जर भाषा हे तत्व राज्य ठरवण्यासाठी अंगिकारले तर उद्या अश्या अनेक छोट्या छोट्या भाषिक गटांकडून अशी मागणी होऊ शकते. थोडक्यात भारतामध्ये अनेक छोटे छोटे भारत वसले आहेत जे आपल्या प्रदेश आणि भाषेशी जोडले आहेत. या बाबतीत विकीपिडिया वरील प्रस्तुत वाक्य According to Census of India of 2001, 30 languages are spoken by more than a million native speakers, 122 by more than 10,000 उल्लेखनीय ठरते (संदर्भ: http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India). जर ह्या अनुषंगाने पहिले तर जसे संयुक्त महाराष्ट्राची मागणी योग्य आहे तशी gurkhaland ची मागणी देखील योग्य मानता येईल. पण अशी छोटी राज्ये अनेकदा अस्थिर असतात. १९९१ पासून गोव्याने आजतागायत १२ मुख्यमंत्री पहिले, गुजरातने ७ तर पश्चिम बंगाल ने ३. अश्या राजकीय अस्थैर्यामुळे राज्याची प्रगती खुंटते. म्हणून कुणाही एका समुदायाला झुकते माप देण्याऐवजी साऱ्यांना समान न्याय देऊन त्यानुसार वागवणे चांगले..

दुसरा मुद्दा: भारतातील अस्तित्वात असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचे लोकाभिमुखीकरण. भारतात स्वातंत्र्य येण्यापूर्वी अस्तित्वात असलेली महसूल आणि इतर प्रशासकीय व्यवस्था ही कार्यक्षम होती. तिच्या कार्यक्षमतेचा पुरावा अर्थात विकास दिसत नव्हता कारण ते मुळात तिची दिशा आणि दश ठरवणाऱ्या लोकांचे ध्येय नव्हते. ब्रिटिशांना भारत जितका मागास ठेवता येईल तितका ठेवायचा होता. अर्थात स्वतंत्र भारताचे उद्दिष्ट असे नाही. म्हणून आहे त्या व्यवस्थेत थोडाफार फेरफार करून तिला चालू ठेवणे जमले असते.

अर्थात आता ह्या साऱ्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. ह्यावर विचारमंथन करण्याचा फायदा काय? फायदा एकच की ह्यातून पुढची पिढी शिकेल आणि देश एक करेल. पण जर भारत पूर्वी कधी एक नव्हता तर आता त्याला एक करायची गरज काय असा प्रश्न लोकांना पडेल. पण ह्याचे उत्तर काळामध्ये दडलेले आहे. सध्याचा काल हा आर्थिक दबावतंत्राचा आहे. ह्याचाच वापर करून चीनने तीआनमेन चौकातला गोळीबार दडपला आणि ह्याचाच फायदा घेऊन अमेरिकेने कोरियाला चर्चेसाठी तयार केले आहे. जर अश्या दबावाला भारताला बळी पडायचे नसेल आणि आपला विकास साधायचा असेल तर भारतातल्या राज्यांना परस्पर सहकार्याशिवाय पर्याय नाही. कारण ह्यांच्या परस्परपूरकतेमध्ये भारताच्या विकासाची गुरुकिल्ली आहे.

Posted in चर्चा स्पेशल | यावर आपले मत नोंदवा

रंगमहाल

मिणमिणत्या समयांच्या प्रकाशानं कोंदुन गेलेल्या आपल्या रंगमहालात चंद्रप्रकाशजी रियाज करीत होते. रामप्रहराची तीच नेहेमीची वेळ. गेली अनेक वर्ष कुठलीही दरबारी मैफिल असो की कुठला प्रवास, चंद्रप्रकाशजींनी आपला हा नेम कधी सोडला नव्हता. खिडकीतून पडद्यांना अलगद बाजूला सरत आत येणारी वाऱ्याची एखादी मंजूळ झुळूक छतावर टांगलेल्या झुंबरांना गोंजारत होती. इतक्यात उघडलेली खिडकी पाहून कुणा सेवकानं तत्परतेनं आत येत ती बंद केली. ‘रिवाज दरम्यान कुठलीही खिडकी अगर दरवाजा उघडा राहू दिला जाऊ नये’ अशी चंद्रप्रकाशजींची फार पूर्वीपासूनची आज्ञा होती. गेली किती तरी वर्षांपासून म्हणजे अगदी चंद्रप्रकाशजी संस्थानचे राजगायक व्हायच्या आधीपासून त्यांची ही आज्ञा होती. पहाटे उठून रामप्रहरीचा रियाझ, त्यानंतर नदीकाठी जाऊन स्नान, मग दरबारात जाऊन जो दिवस असेल त्यानुसार रागाचे गायन, चैत्र महिना आला की चैती, होळी आली की होरी यांचे गायन, मग परत येऊन जेवण, मग वामकुक्षी, मग पुन्हा सायंकाळची मैफिल… चंद्रप्रकाशजींचा दिनक्रम अगदी ठरलेला झाला होता. फार पूर्वी कधीतरी ऐकलेल्या कुणा एका अनवट रागाची धून आज चंद्रप्रकाशजी आळवत होते. पण आज का कोण जाणे सूर नेहेमीसारखे लागत नव्हते. गेले कित्येक वर्ष चंद्रप्रकाशजी  त्याच त्याच राग-रागिण्या गात होते. दरबारातल्या लोकांची आवड ही भीमपलास, हंसध्वनी, कानडा ह्यांच्या पलीकडे जात नव्हती. त्यानुसार चंद्रप्रकाशनी देखील स्वतःला तयार केलं होतं. पण गेले काही दिवस ते व्यथित होते. रियाजामध्ये नेहेमीसारखं मन लागत नव्हतं. म्हणून त्यांनी आज त्यांचे गुरु पंडितजींना बोलावलं होतं.

पंडितजी संस्थानाच्या बाहेर असलेल्या एका खेडेगावात राहायचे. गावाबाहेर त्यांची एक छानशी झोपडी होती. राजेसाहेबांनी त्यांना अनेकदा आपल्या संस्थानचे राजगायक करायचा प्रस्ताव दिला होता आणि दर वेळी पंडितजींनी तो नम्रपणे नाकारला होता. अखेर त्यांचे शिष्य असणाऱ्या चंद्रप्रकाशजींची निवड राजेसाहेबांनी केली होती. पंडितजी आले अशी वर्दी दरवाज्यावरच्या दरबानाने दिली तसे चंद्रप्रकाशजी आपली वीणा बाजूला ठेवून उठले. दारापाशी जात त्यांनी आपल्या गुरूंना नमस्कार केला. “कीर्तिमान भव” गुरुजी त्यांच्या नेहेमीच्या धीरगंभीर स्वरात म्हणाले. चंद्रप्रकाशजींनी त्यांना बसायला आसन दिलं. “बोला राजगायक, काय काम काढलंत?” पंडितजी हसत म्हणाले. “काय थट्टा करता गुरुदेव?” ओशाळवाणे होत चंद्रप्रकाशजी म्हणाले. “थट्टा? मी कधी केली ती?” हसत पंडितजी म्हणाले. “बरं हे सांग कशासाठी इतक्या तातडीने बोलावलंस?” चंद्रप्रकाशजींच्या चेहेऱ्यावरचे ओशाळवाणे भाव बघून पंडितजी म्हणाले.

“गेले कितीतरी दिवस रियाजात मन लागत नाही गुरुदेव.” चंद्रप्रकाशजी दु:खी होत म्हणाले.

“काही विशेष कारण? काही विशेष घडलं का?” इति पंडितजी.

“विशेष असं काही नाही. पण हो.. मागे एकदा नदीकाठाहून जात होतो. घाटावर धुणं धूत असलेल्या एका छोट्या मुलीची सहज मारलेली तान कानावर पडली आणि खूप वर्षापूर्वी तुमच्या आश्रमात आलो होतो तेंव्हा मी गायलेलं गाणं आठवलं. आज विचार करतो तेंव्हा वाटतं असं परत गाता येईल का? माझं गाणं मला सोडून चाललंय असं वाटतंय. हा वाढत्या वयाचा परिणाम आहे की कशाचा ते कळत नाही. म्हणून गेली दोन रात्री झोपलो पण नाहीये. अखेर न राहवून तुम्हाला बोलावणं पाठवलं. तुम्हीच सांगा मी काय करू.” काकुळतेने चंद्रप्रकाशजी म्हणाले.

पंडितजींनी आजूबाजूला पाहिलं. एका खिडकीपाशी जात त्यांनी ती उघडली. “सोप्पं आहे बघ, ह्या बंदिस्त रंगमहालात आवाज घुमतो आणि घुमणाऱ्या आवाजातले दोष कळत नाहीत.” मंद हसत ते बोलले. “येतो मी.”

दारातून बाहेर जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे चंद्रप्रकाशजी बघतच राहिले. खिडकीतून पडद्यांना अलगद बाजूला सरत आत येणारी वाऱ्याची मंजूळ झुळूक छतावर टांगलेल्या झुंबरांना पुन्हा एकदा गोंजारु लागली.

Posted in Uncategorized | १ प्रतिक्रिया